वाईटाचा शेवट वाईटच होतो
एका गावात तीन चोरटे राहत होते. एका रात्री त्यांनी एका श्रीमंत माणसाच्या घरी मोठी चोरी केली. त्यांनी सर्व पैसा-अडका, सोनं-नाणं एका पिशवीत भरले आणि जंगलाच्या दिशेने पळाले. जंगलात पोहोचले,पण त्यांना कडाक्याची भूक लागली होती. त्यांच्याजवळ खायला काहीच नव्हते, त्यामुळे त्यातला एक चोर जेवण आणण्यासाठी जवळच्या गावात गेला. उरलेले दोन चोरटे चोरीच्या मालाची राखण करीत जंगलातच थांबले.
जो चोर जेवण आणायला गावात गेला होता, त्याची नियत बदलली. चोरीचा सगळा माल एकट्याने हडपाण्याचा डाव रचला. पहिल्यांदा त्याने हॉटेलमध्ये जेवण केले. नंतर दोघांसाठी जेवण बांधून घेतले. त्यात विष कालावले. त्याने विचार केला की, जेवणात विष घालून दोघांना मारून टाकू आणि सगळा माल हडप करू. इकडे जंगलातल्या दोघा चोरांनी जेवण आणायला गेलेल्या मित्राचा खून करण्याचा कट रचला. त्यांनी आपल्या वाटेतील अडसर दूर करून सगळा माल दोघांत वाटून घेण्याचे ठरवले होते. पहिला चोर जेवण घेऊन जंगलात आल्यावर दोघांनी मिळून त्याच्यावर काठ्या-कुऱ्हाडयांनी हल्ला केला आणि त्याला मारून टाकले. तो मला आहे, याची खात्री केल्यावर दोघेही शांतपणे जेवायला बसले. पण विषारी भोजन केल्याने ते दोघेही तडफडून तडफडून मरून पडले. अशा प्रकारे तिघांचाही शेवट वाईट प्रकारे झाला. शेवटी वाईटाचा अंत हा वाईटच होत असतो.

Comments
Post a Comment